रविवार, ८ मे, २०१६

आई तू उन्हामध्ये


आई तू उन्हामध्ये
सावलीचं गाणं गायचीस
मी तुझ्या चेहऱ्याकडे पाहत राहायचो
.......सावलीचा पदर शोधत.

सावल्यांतल्या कवड्शांना
हातावर नाचवत... झुलवत..
दिवस कधीच निघून गेले
आणि त्यामागून तुही...

फक्त उन्ह होतं तसंच
सावली नसलेल्या जागेवर
कवडसे उरलेच नाहीत.

आता आखं उन्ह जेव्हा
पोळायला लागतं मला
तेव्हां मी तुझं ते गाणं
आठवण्याचा प्रयत्न करतो
पुन्हा पुन्हा.

पण काय सांगू
सूर सापडतात जरा जरा
पण शब्द
निघून गेलेले सावलीला.

मी कवडसे गोळा करण्याचा
तो खेळ विसरून गेलोय.
सावली आता नाहीच कुठे
सर्वत्र उन्ह पोळतच आहे.

आता कधीतरी
आणखीन वाढेल उन्ह...
अन् तयार होईल
एखादी निर्वात पोकळी
त्यात पाचोळ्यासारखा
उडून जाण्याची
मी वाट बघतोय आई.

मी म्हणालो

मी म्हणालो

“ तुला वाचा असून
तू इतका मुका का ?”

तो म्हणाला

“ मी माझ्या शब्दांचं सोनं होण्याची...
लोकांच्या ओठातलं गाणं होण्याची...
माझ्या बोलाची ‘विधानं’ होण्याची...
अमक्याचे ‘उद्गार’ म्हणून ते एखाद्या
वृत्तपत्रात छापून येण्याची...
माझ्या बोलण्याला केवळ बोलणे न होता
त्यांची ‘वक्तव्य’ म्हणून गणना होण्याची...
मी वाट बघतोय.”

“मग जग त्याचं विश्लेषण करेल
मग खरंतर काहीतरी उरेल”

“माझ्या शब्दांच्या धगीनेही कधी
कुणाचे पेटून उठेल रक्त
बस्स ...
त्या क्षणाची मी

वाट पाहतोय फक्त.”

जराच थांब राजसा

जराच थांब राजसा
येऊ दे रे सांजवा
चंद्र ही दिसू देत नि
दिसू दे रे काजवा

रात ही तुझीच रे
तुझाच देह चांदवा
निवू देत दिन जरा
बावरतो रे मनवा

चांदण्यात न्हावूया
आभाळाचे होऊया
मनामागे कुठेतरी
दूरवरी जाऊया

पेटवून रात्र ही
शांतवूया दीप हे
निजल्यावर चंद्र हा
तू मला कवेत घे

पळ ना कळो तुला
ना कळो मला तसाच
पेटत्या कंदिलातली
पुसू नकोस आज काच

शब्द गोठू देत जरा
जराच सरू दे ही रात
चांदण्या उमलू देत
हळू हळू या नभात


उद्ध्वस्त वादळाचे किनारे शोधताना

उद्ध्वस्त वादळाचे किनारे शोधताना
कसा अचानक शब्दांना फुटतो पान्हा
या कवितांचा अर्थ माझा प्राण झाला

आभाळाचा रंग माझ्या डोळीयांना आला 

आता हमरस्त्यावर मांडून संसार

आता हमरस्त्यावर मांडून संसार
डोळ्यात विझलेला गाव घेऊन
पायांखालची जमीन शाबूत ठेवायची.
कधी भेटलेच हाताला काम
तर घामाला किंमत असते म्हणायचं.

नसलेल्या देवाला हाका देवून तरी
काय उपयोग ?
पाणी पापण्यात आहे...
तेवढंच आपल्या हक्काचं

रोज ढाळायचं

आणि मरण टाळायचं.

माझ्याच किनाऱ्यावर

अनिवार उन्हाचा ताप, जसा की शाप, अहिल्येला.
मी उगाच मिटतो डोळे, प्राण तळमळे, गुढ सांजेला.

हातात दिशांचे दान, तसे अपमान, उरलेले ओठी.
काहूर की हुरहूर असे ही, तरीही, उरात घनांची दाटी.

मी शब्द दिलेला, मुग्ध झालेला तुला, सांजेच्या वेळी.
नजरेत भग्न गोपुरे, मुकी वासरे, निष्पर्ण काही ओळी.

अनिवार उन्हाच्या झळा, तसा कळवळा, तुझा गं सखे.
माझ्याच किनाऱ्यावर, करू देत घर, तुझी साजिरी दुःखे.


अंगणात फुललेली

अंगणात फुललेली
महानंदीची जाळी
आभाळाला टाळी
नको देऊ

खांद्यावर ओझे
करपले हात
मुखामध्ये शीत
नको ठेऊ

वाटेवर धूळ
माखले पाऊल
कुणाची चाहूल
घेऊ नको

सांजच्या दाराला
पिकलेला जीव
त्यात आणि हिव
लेऊ नको.


आज तुझ्या कुशीच्या गाभाऱ्यात

आज तुझ्या कुशीच्या गाभाऱ्यात
मला निवांत झोपू दे जरा.
जितके वाहू पहातायत डोळे
तितके वाहू दे जरा.

तुझी बोटे फिरू देत आज
माझ्या केसांतून
आज तुझ्या मिठीतून
मला गाढ लपेटून घे.
आईच्या पदराआड
लपणाऱ्या पोरासारखा. 

आज मला काहीच विचारू नकोस.
आज मला काहीच सांगू नकोस.
मी का रडतोय म्हणून
कोलमडणार नाहीस तू
खात्री आहे मला.
फक्त झीटकारण्याचं पाप
तेवढं करू नकोस आज.

आज मला रडू दे
तुझ्या कुशीत...
माझं सारं भरलेपण
तुझ्या पदरात
रितं करू दे....

एकदाचं.

म्हणजे उद्याच्या
नव्या दुःखासाठी
मी ताजा तवाना होईन.


०९.११.२०१२ 

आठवणींना नसतो शेवट

आठवणींना नसतो शेवट
सुरुवातही नसते कुठेच
तरंगताना मन कधी
ढग होऊन सोबत करताना
हात लावताच विरणाऱ्या
गडद जांभळ्या वातावरणात
मनभर पसरणाऱ्या

जुन्याच वळणावर
नव्याने घसरणाऱ्या

रोजच्या धांदलीत
नकळत विसरताना
आठवतात
आठवणीं
कुठे दुरवर
करतात पाठवणी.


२८.२०१२

आमुक एक घटना घडल्यावर

आमुक एक घटना घडल्यावर
बातमीदारांनी तिला कवरेज दिलं भरपूर.
याने त्याला त्याने याला करत करत
शेवटी घरोघरी ही बातमी पोचलीच.
तेंव्हा वाईट वाटलंच साऱ्यांना
लोक हळहळले ...
आणि दिवसभर
ही बातमी चघळून
झोपी गेले निवांत.

पण रात्री ज्यांना झोपेत
स्वप्नं पडली भयानक
त्यांनी सकाळी उठून मोर्चे काढले
कँन्डल मार्च काढले...
रस्ते अडवले ...
वाढत वाढत वाढतच गेली
निषेध नोंदवणारी गर्दी.

आणि उभा देशच जागा झाला म्हटल्यावर
शेवटी नाविलाजाने का होईना
सरकारची झोपमोड होणं क्रमप्राप्त होतं.

आता ब्रेकिंग न्यूज येते आहे.....
" या सगळ्या प्रकरणाचा
छडा लावल्याशिवाय
सरकार आता शांत झोपणार नाही !"


- गजानन मुळे

एकांतात मनाला लाभले देऊळ

एकांतात मनाला लाभले देऊळ
गाभाऱ्यात घुमताना हळवीशी शिळ

पायरीशी कुणी का थांबले उगाच
कुणाच्या गं पायी आज रुतलेली काच

वेच गोवऱ्या दुपारी हलताना वारा
हलू दे थोडासा मध्यान्हीला पारा

पदराची गाठ सये सोडूच नकोस
कुणी सांगेल का कधी येईल पाऊस

एकदा ओलेत्या केसांनी

एकदा ओलेत्या केसांनी
आली होतीस समोर
आणि विचारलं होतंस..
‘मी कशी दिसतेय ?’ म्हणून.

खरंतर कविताच आली होती ओठांवर
अचानक ढग दाटून यावेत तशी
पण मी स्वतःवरून वाहत्या वाऱ्यात
वाहून गेलो.
.. मुसळधार कोसळायचं होतं
...राहून गेलो.

अजूनही मी भरून येतो
अधूनमधून
कोसळतोही मुसळधार
पण ओलेत्या केसांची
तू नसतेस समोर विचारायला
‘मी कशी दिसतेय’ म्हणून.

हे असं अवेळी भरून येणं
विजा पोटात घेऊन भरकटणं
म्हणजे
निव्वळ सोंग वाटतंय हल्ली.
ज्याला कुठेच अर्थ नाही
काहीच.

अशा निरर्थ पावसात
भिजणार कोण
आणि रुजणार तरी कसे.

हल्ली पाऊस येऊन
उभा असतो खोलीबाहेर
बोलावतोही मला बाहेर.
कोसळतो मुसळधार
हाका मारतो.

मी मात्र
अर्थ उडून गेल्या कवितेसारखा
बसून असतो खिडकीजवळ.
माझ्याजवळ काहीच नाही
त्याला देण्यासारखं.
साधी साद सुद्धा.

उन्हाळा



रानामध्ये किलबिलताना साळुंखीचा थवा
रिते रिते हात घेउनी जाऊ कुठल्या गावा

रानफुलांचे विझले दिवे, वाटेवरची धूळ उडे
विहिरीवर मी न्याहळत बसतो चिरा – तडे

पांढरपेशा रानामधला फड ऊसाचा पडला काल
आकाशातून रक्त ओकतो गोल सूर्याचा लालेलाल

गावामधला पार देवाचा दिसतो आता सुना सुना
भरून होती ओंजळ हिरवी, आता उरल्या फक्त खुणा

मी पायांना सांगून थकलो; नका थांबू उचला पाय
झळा वेढल्या गोठ्यामधली हंबरताना तांबी गाय 

खेडे

उन्हाच्या गर्द छायेत
खेडे निपचित निजलेले
भर दुपारी.

पायाखाली पोखरलेली भुई
वर आकाश वेडावलेलं
आता उघड्या रानात
खुरांची पायपीट नुसती
गवताची काडीही नाही
ना तरी
उरल्या सुरल्या रानाला

आग लागली असती.