शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

ती खूप दिवसांनी भेटली तेंव्हा


ती खूप दिवसांनी भेटली तेंव्हा
सांगत होती काहीबाही
अधीर होऊन
बोलत होती मनसोक्त.

मी मात्र डोळस असून
आंधळा झालो.
आणि चालत गेलो
तिचीच वाट....
चालता चालता
तिच्या ओठांतून ठिबकणाऱ्या
शब्दांच्या प्रवाहात
वाहूनच गेलो अचानक...  
आणि नंतर कसोशीनं
प्रवाहाच्या उलट दिशेनं....
पोहत पोहत तिथे पोचलो...
जिथे तिच्या काळजाच्या किनाऱ्यावर
नक्षी कोरत वाळूवर ...
कुणीतरी केलेलं घर.
आणि नंतर
मीही मग
जाऊन उभा राहिलो...
गुढगाभर पाण्यात
एखाद्या ध्यानस्थ बगल्यासारखा
सावजाची वाट बघत ...

... ती बोलतच होती ....
... ती बोलतच होती ..........!!

आणि अखेरपर्यंत
सावजासारखा मला तिचा
एकही शब्द सापडला नाही.....!!

- Gajanan Mule

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

गैरसमज


प्रस्थरांवर कोरून ठेवावेत
एकेका दिवसाचे अंक....
आणि नंतर
याच खडकाच्या ढिगाऱ्यावर बसून
आयुष्याचा हिशोब चुकता करावा.

विश्वासाने कुणाच्या खांद्यावर टाकावा हात
तर हात निखळतात हल्ली ...
शब्द टाकून पहावा कोणाकडे तर
शब्दांचा खच पडतो आपल्याच पुढ्यात हल्ली....

त्यापेक्षा चिमण्यांशी ... झाडांशी ...
मावळत्या ....उगवत्या सूर्याशी बोललेलं बरं ....
समुद्रकिनाऱ्याची मऊशार वाळू तुडवत
संध्याकाळ घालवलेली बरी....

किंवा शेवटी उंबरठ्यावर बसून
समोरच्या चिंचोळ्या गल्लीतली गर्दी न्याहाळलेली बरी ....

हल्ली माणसांत मिसळलं की
भाऊगर्दीत सामील झाल्याचा 
माझा पक्का गैरसमज होतो.....!!

-    गजानन मुळे