शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

गैरसमज


प्रस्थरांवर कोरून ठेवावेत
एकेका दिवसाचे अंक....
आणि नंतर
याच खडकाच्या ढिगाऱ्यावर बसून
आयुष्याचा हिशोब चुकता करावा.

विश्वासाने कुणाच्या खांद्यावर टाकावा हात
तर हात निखळतात हल्ली ...
शब्द टाकून पहावा कोणाकडे तर
शब्दांचा खच पडतो आपल्याच पुढ्यात हल्ली....

त्यापेक्षा चिमण्यांशी ... झाडांशी ...
मावळत्या ....उगवत्या सूर्याशी बोललेलं बरं ....
समुद्रकिनाऱ्याची मऊशार वाळू तुडवत
संध्याकाळ घालवलेली बरी....

किंवा शेवटी उंबरठ्यावर बसून
समोरच्या चिंचोळ्या गल्लीतली गर्दी न्याहाळलेली बरी ....

हल्ली माणसांत मिसळलं की
भाऊगर्दीत सामील झाल्याचा 
माझा पक्का गैरसमज होतो.....!!

-    गजानन मुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!