बुधवार, २८ डिसेंबर, २०११

आंदोलन

हे आडखळनं ...पडणं..
तुटक तुटक बोलणं ...
श्वासांना मोजत मोजत
उपवास कारणं ...
खरंच पुरे आता ..!!

इथे...इथे...या इथे...
अन् तिकडे ....त्या तिथेही...
काळोखच काळोख नुस्ता
फक्त काजव्यांचे दिवे त्यात
पुरे आता ...!!

पेटवावा सूर्यच
अवघा माशालींचा ...
पणती ...दिव्यांचा नाच
आणि
रोजचे कॅन्डल मार्च
पुरे आता....!!

किती  शपथा ...

किती वृत्ते ...
किती आश्वासने ....
साऱ्या आणाभाका ...
..पुरे आता ...!!


मस्तवाल झालेत हत्ती
साखळदंड नाहीत कुणाला .
आसमंतात धुरांचे लोट नुस्ते
पुरे आता..!!

" हा टापांचा आवाज कुठला ...?
....ही धूळ कुठली ...?
...हा गाजेचा नाद कुठला ...?
..ही चमक ...ही धमक ...

....हे वाऱ्यावर तरंगणारे
उध्वस्त काळीज कुठले ....? "
हे शब्दांचे वादळ नुस्ते
पुरे आता  ..!!

" हा जयद्रथ हा सूर्य "
इशाऱ्याचे बोट आपलेच
तुताऱ्यांचे ओठ आपलेच
सारथी आहेत अज्ञात कोणी
परंतू संग्राम आपला...
...लढाई आपली
...शस्त्र आपणच
...अस्त्र आपणच

बस्स....
रथावरचा देव होणे ..
...पुरे आता ...!!
....पुरे आता...!!


- गजानन मुळे
२६.१२.२०११.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!