मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

नाकारताही आला पाहिजे रस्ता

नाकारताही आला पाहिजे रस्ता
हमरस्त्याला मिळणारा.
मळवाटांवरून चालणाऱ्यांची
दखल घेतच नाही काळ,
त्यांची पाऊलचिन्हे
उमटतात ... मिटतात फक्त ...
रोजच्या रहदारीत
हरवुनही जातात
तितक्याच सहज.

नव्या वाटेची
नव्या दिशेतून
नव्याच पावलांनी
सुरुवात करायलाच हवी.
मग बघ ...
तुझ्या दमदार पावलांच्या
ठशांना पाहून
सांगेल कुणीही नंतर...
कित्येक दिवस की...
“तो...तो या इथूनच तर गेला होता
इथूनच निघाला होता...” म्हणून.

कुणी ना कुणी
टाकेलच ते पाहिलं पाऊल
मग ते तुझंच का नको ?

या पुढच्या प्रत्येक पावलांसाठी
माझ्या हार्दिक शुभेच्छा !!

- गजानन मुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!