रविवार, ८ मे, २०१६

आमुक एक घटना घडल्यावर

आमुक एक घटना घडल्यावर
बातमीदारांनी तिला कवरेज दिलं भरपूर.
याने त्याला त्याने याला करत करत
शेवटी घरोघरी ही बातमी पोचलीच.
तेंव्हा वाईट वाटलंच साऱ्यांना
लोक हळहळले ...
आणि दिवसभर
ही बातमी चघळून
झोपी गेले निवांत.

पण रात्री ज्यांना झोपेत
स्वप्नं पडली भयानक
त्यांनी सकाळी उठून मोर्चे काढले
कँन्डल मार्च काढले...
रस्ते अडवले ...
वाढत वाढत वाढतच गेली
निषेध नोंदवणारी गर्दी.

आणि उभा देशच जागा झाला म्हटल्यावर
शेवटी नाविलाजाने का होईना
सरकारची झोपमोड होणं क्रमप्राप्त होतं.

आता ब्रेकिंग न्यूज येते आहे.....
" या सगळ्या प्रकरणाचा
छडा लावल्याशिवाय
सरकार आता शांत झोपणार नाही !"


- गजानन मुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!