गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

डोळ्यांना या .....

डोळ्यांना या पापण्यांना सोपवावे लागते.
आसवांना पाप
ण्यांशी थोपवावे लागते.

मी म्हणावे शब्द माझा हरवला आहे जरी 
ही कविता काळजाची प्राणाइतकी आहे खरी 

बोलायचे नसतानाही मी बोलतो आहे जसा 
काय वाट्टेल ते वाटो, मी आहे हा असा 

संपेल ही मैफिल जेंव्हा खंत ना राहो अशी 
झोपताना आसवांनी भिजवायची राहिली उशी.

- गजानन मुळे
२९/०१/२०१४

रविवार, १९ जानेवारी, २०१४

तू दिलेल्या आभाळावर

तू दिलेल्या आभाळावर
मी रोज सकाळी तिळा लावतो.
सांजेला चित्र रंगवतो.
आणि रात्री चांदण्या पेरतो.
 
पण कधीतरी
खूप राग आल्यावर
मला गाढ झोप लागल्यावर
त्यावेळी झोपेत
भयंकर स्वप्न पडल्यावर
मी दचकून जागा होतो.
आणि
तू दिलेलं आभाळ पाहतो.
 
तेव्हां
गाळात असतं आभाळ...
आणि माझा सूर्य, माझी चित्र...
माझ्या चांदण्या...माझा चंद्र...
वाहून गेलेलं असतं सगळं...!!
 
मला कळत नाही
रोज रात्री मी झोपल्यावर
का रडत असतं आभाळ !
 
तू निघून गेलीस तेंव्हापासून
हे असं चाललंय माझं
माझं नाही पण
या आभाळाचंच
वाढत चाललंय ओझं....
 
१८.०६.२०१२ 

ग्रेस....मंतरणारा



तुझे शब्द आभाळाच्या काजळखोलीतून
मंतरणाऱ्या श्वासाची वाट काढत
पुढे आले ...
आज आभाळ सुनं सुनं,
संध्येचा प्रहर सुना सुना,

माणसाच्या आदिम दुःखाला
कल्पनेच्या तीरावर,
संगीताचे मुलभूत पंख
आता कोण देईल...????

करुणातूर झाडांना
सळसळत्या पानांचे दान
कोण देईल....??

कोण म्हणेल आता प्रार्थना
जळणाऱ्या क्षितीजासाठी;
कोण आईच्या उदरात जावून
शोधील तिचं सुख – दुःख...??

कुणाला शक्य आहे आता
गाईच्या हंबराला शब्दात बांधनं...?

आता गहिवर उरतील शब्दांचे फक्त
आणि आकांत तुझी आठवण काढत
वाऱ्यावर झुलणाऱ्या रानात
संध्याकाळी बुडून जातील.

तू काळाला खुडून घेतलंस...
आणि आत्ममग्न झालास
आज कायमचा ...

आता तुझ्या शब्दांच्या वाटेने
अर्थांचा सोहळा शोधत
आम्ही किती संधिकाल

सजवत रहायचे मनात....?

थांब थोडा; बोलू जरा.

थांब थोडा; बोलू जरा.

किती दिवस हा विजनवास
आणि किती दिवस उपवास
तू असा उभं रहा
उद्याची पहाट तुझी आहे.

अरुणोदयानंतर
प्रकाशाच्या लोंबत्या हातांना
शरण जा वाटलंच तर.
नुसताच उभा नको राहूस
जरा प्रकाशात ये.

तुझ्या असण्याचं अस्तित्व
जाणवू दे या जगाला जरा.
आणि कधीतरी एखाद्वेळ
अगदी एखादवेळ तरी
वेळ साधूनच
तुझ्या नसण्याने
निर्माण होणारी पोकळी
किती मोठी आहे
याचीही ओळख करून देत जा
अधूनमधून रस्त्यावर येऊन.

तुझी पावलं थकत नाहीत...
तुझे खांदे दुखत नाहीत...
हात फक्त हलके झालेत.
मुठी अगदी सैल झाल्यात....

म्हणूनच तुझ्या सर्रास आत्महत्त्या
विसरल्या जाताहेत.
कोऱ्या करकरीत कागदावर अंगठ्याचा ठसा
इतकीच का तुझी ओळख...
थांब थोडं; थांब जरा
क्षितिजाच्या कानांनी कधीतरी
ऐकेल ना ही धरा


२०.११.२०११ 

आता हमरस्त्यावर मांडून संसार

आता हमरस्त्यावर मांडून संसार
डोळ्यात विझलेला गाव घेऊन
पायांखालची जमीन शाबूत ठेवायची.
कधी भेटलेच हाताला काम
तर घामाला किंमत असते म्हणायचं.
 
नसलेल्या देवाला हाका देवून तरी
काय उपयोग ?
पाणी पापण्यात आहे...
तेवढंच आपल्या हक्काचं
 
रोज ढाळायचं
आणि मरण टाळायचं.
 
०९.०५.२०१२

उन्हाच्या गर्द छायेत

उन्हाच्या गर्द छायेत
खेडे निपचित निजलेले
भर दुपारी.

पायाखाली पोखरलेली भुई
वर आकाश वेडावलेलं
आता उघड्या रानात
खुरांची पायपीट नुसती
गवताची कधीही नाही
ना तरी
उरल्या सुरल्या रानाला
आग लागली असती.


०९.०५.२०१२

चांदणे निजताना उत्तररात्री

चांदणे निजताना उत्तररात्री
तारकांचा देश मावळताना
उशाचा दिवा मंद करून
पापण्या पांघरून घ्याव्यात
अन् डोळ्यांत जागं व्हावं वादळ
दिवसभर निवांत निजलेलं.
 
तुझी आठवण तशी अवेळी येणारी
मंदावल्या दिव्यांच्या रेषांतून
काजळाचा चिरा चिरा उजळवणारी
 
मला माहित नाही
का झालं ? कसं झालं ?
पण कळतं इतकंच की...
 
शेवटी तरी निघताना
तुझ्या डोळ्यांत दाटलेलं आभाळ
मी पहायला सगळे होते.
 
ती भूल अजून सलते आहे
रात्ररात्रभर काही ना काही
बोलते आहे.
 
०९.०५.२०१२

एकांतात मनाला लाभले देऊळ

एकांतात मनाला लाभले देऊळ
गाभाऱ्यात घुमताना हळवीशी शिळ

पायरीशी कुणी का थांबले उगाच
कुणाच्या गं पायी आज रुतलेली काच

वेच गोवऱ्या दुपारी हलताना वारा
हलू दे थोडासा मध्यान्हीला पारा

पदराची गाठ सये सोडूच नकोस
कुणी सांगेल का कधी येईल पाऊस

०९.०५.२०१२

  

आंबा पाडाला आला.

पळसफुलांनी बहरलेल्या
या 
उजाड रानात
बाभळ...
निष्पर्ण झालेली.
कडूनिंबाला
 पालवी फुटलेली.
आणि तू...
हिरव्यागार जांभळीच्या सावलीत...
झोके घेताना...

..................
.................
आंबा पाडाला आला.


०९.०५.२०१२

घर करू दे पिल्लांना

घर करू दे पिल्लांना
तुझ्या घरट्यात बाई
कालच्या पावसात
त्यांची हरवली आई

नको ओळख पाळख
रक्त त्यांचे लाल
दैवरात निथळले
जसे पाकळ्यांचे दल

कोरड्या हाकेने
नको होऊस आंधळी
रात्रीला विचारेल
तुझे नाव गं गोंधळी


-    २९.०२.२०१२

अंगणात फुललेली

अंगणात फुललेली
महानंदीची जाळी
आभाळाला टाळी
नको देऊ

खांद्यावर ओझे
करपले हात
मुखामध्ये शीत
नको ठेऊ

वाटेवर धूळ
माखले पाऊल
कुणाची चाहूल
घेऊ नको

सांजच्या दाराला
पिकलेला जीव
त्यात आणि हिव
लेऊ नको.


२९.०२.२०१२ 

मला घराबाहेर पडायलाच हवं.

कुंपणाच्या तटबंदीत
घराचा बालेकिल्ला झालाय...
अंगणात पाणीही साचलंय खूप.

आता वाटा निसरड्या झाल्या असतील...
बाहेर पडेन तेंव्हा
पाऊल जपून टाकायला हवं.
चौकटीचा हा येवढा खंदक
पार झाला की झालं,  
... आलंच आपलं गाव.

किती दिवस... किती महिने
एव्हाना किती वर्षे उलटून गेली असतील....
मी घराबाहेर पडलो नाही.

असा आलो आत
आणि गुंतून पडलो घरातच
साधताच आला नाही मुहूर्त
या इथून निघण्याचा.
निमित्ते शोधत वाट पाहत राहिलो
वेळ येण्याची...

ती आलीच नाही
मात्र आता
उरल्या सुरल्या दिवसांची
मौज लुटायला
मला घराबाहेर पडायलाच हवं.


२१.०२.२०१२ 

माणसांना माणसांशी जोडूया चला

पाखंड हे खंड खंड फोडूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

धर्म, पंथ, संप्रदाय हे निर्मिले कुणी
निर्मिकास जोखडात आवळले कुणी
देव आज देव्हाऱ्याबाहेर काढूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

मंत्र तंत्र यज्ञ याग बहुत माजले
नकळते ऋचा-श्लोक खूप पाजले
आपल्यातला देव आज शोधूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

गुदमरतो फुलांमध्ये देव आपुला
आपल्याच मुलांमध्ये शोधू देव आपुला
आंधळे ते नेत्र आज गाढूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

अंध काही परंपरा या जाळूया चला
विकासाचा राष्ट्रधर्म पाळूया चला
अनाकलनीय हे दोर आज तोडूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

थोर इथे संत झाले ज्यांनी धर्म जाणला
मानवातील माणसालाच रे देव मानला
कल्पनेतील चित्र त्यांच्या काढूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला


३०.०८.२०१३